Friday, July 31, 2020

"मैं हूं ना इधर"

श्री स्वामी समर्थ,
मैं हूं ना इधर,
हम गया नही जिंदा है.......

"अशक्य ही शक्य करतील स्वामी" हे वाक्य बोलायला जितके सोपे आहे, तितकेच अनुभवायला कठीण जाते. कठीण यासाठी कारण, आपला आपल्याच स्वामींवर विश्वास नसतो पण ते प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत असतातच. तुमच्या - माझ्या अंतरंगात, ते भिनलेल्या नामात, शरीरातल्या रक्तात सळसळत वहात असतात. गरज असते ती त्यांचे अस्तित्व ओळखण्याची. या लॉकडाऊनच्या काळात  प्रत्येकाला स्वामींचा आलेला अनुभव हा पुढे एका अनुभूतीद्वारे मांडतोय हा खरा की खोटा हे तुमच्या अंतरंगातील स्वामींनाच विचारा, बाकी ज्यांना पटणार नाही त्यांनी गोष्ट म्हणून वाचून सोडून द्या कृपया वाद घालू नये ही विनंती.......

"श्री स्वामी समर्थ" म्हणा रे गड्यांनो स्वामी समर्थ म्हणा. 

 रस्त्याच्या कडेने जाताना सहज त्याचे लक्ष स्वतःच्या सावलीकडे गेले, ती सावली त्याला त्याची वाटली नाही, त्याने मागे वळून पाहिले कोणीही नव्हते, हात-पाय हलवून पाहिले तरी तसेच भाव सावलीचे, काहीच उपयोग नाही पण ती सावली का कोण जाणे त्याची वाटत नव्हती, इतक्या वर्षात आज त्याला काहीतरी वेगळेपण जाणवत होते स्वतःच्याच सावलीमध्ये, तितक्यात त्याला रस्त्याच्या कडेला एक मंदिर दिसले. मंदिराचे दार बंद होते त्याने बाहेरून निरखून पाहिले,  आणि तोंडातून शब्द फुटले स्वामी हो, अवधुता दिगंबराssss अहो काय ही अवस्था? कुठे आहेत तुम्ही? तुम्हालाही हा लॉकडाऊन सोसावा लागतोय? अहो तुमचे भक्त पोरके आहेत तुमच्या शिवाय, माय-बापा संपवा हा कोरोना. स्वामी हो दर्शनासाठी दार उघडा, आणि पुढच्याच क्षणाला त्याच्या नयनांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली.

तो भानावर आला ते मोबाईलच्या रिंग मुळे... समोर बायको होती. "अहो ऐकलं का? TV वर बातमी आली आहे, आज रात्रीपासून लॉक-डाऊन संपले." त्याने तिथेच फोन cut केला आणि धाय मोकलून रडू लागला, स्वामी जर हे छोटेसे मागणे आज पुर्ण केले तर मग इतके दिवस कुठे होता हो?" त्याचे सहजच लक्ष त्याच्या सावलीकडे गेले, त्याची ती सावली त्याच्यापासून वेगळी होत होती, आता त्याला दोन सावल्या दिसू लागल्या एक ती जी त्याचीच होती जी तो इतकी वर्षे बघत असायचा, मग ती दुसरी जी त्याला समजली नाही आणि आता बाजूला झाली ती कोणाची? त्याला मागून आवाज आला, "मैं हूं ना इधर म्हणत......" हम गया नही जिंदा है |" त्याने मागे वळून पाहिले तर साक्षात स्वामी उभे होते, त्याचं अवसान गळलं, त्याने स्वतःला मोकळं केलं ते थेट स्वामींच्या चरणांवर.

स्वामींनी त्याला स्वतःच्या कवेत घेतले, त्याचे अश्रू पुसले, त्याला मंदिराच्या पायरीवर बसवले आणि समजावले. अरे इतके दिवस तुझ्या लक्षात आले नाही, मी तर कायम तुझ्या हृदयात बसतो ना? मग मी या देवळांमध्ये बंद कसा? मी तुझ्याबरोबर तुझी सावली होऊन फिरतोय, आठव ते सगळे दिवस जेव्हा तुला माझी खरी गरज होती, तिथे प्रत्येक वेळी मी कोणाच्या ना कोणाच्या रुपात तुला मदत केली....

स्वामीनामामध्ये गुंग रहात एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत स्वतःची व आपल्या कुटुंबाची उपजीविका करणारा तो माधव फारच मेहनती होता. घरामध्ये माधव त्याची बायको आणि एक छोटे गोंडस बाळ असे सुखी कुटुंब होते, हसत खेळत त्यांचे दिवस जात होते आणि एक दिवस अचानक जगावर कोरोना महामारीचे संकट आले. छोट्याश्या घरात सर्वांना सांभाळत असताना घरात आहे त्या सामानामध्ये त्याने एक महिना काढला आणि त्यानंतर मात्र एक दिवस त्याला कंपनीच्या मॅनेजर चा फोन आला कंपनी बंद करण्यात आली आहे, त्यामुळे सर्वांनाच कामावरून कमी करण्यात आले आहे. माधव हडबडला... स्वामी हो त्याने स्वामींना हाक मारली. घरामध्ये जेमतेम 2 दिवसांचे जेवणाचे सामान आहे त्यापुढे काय? बाहेर ही महामारी सुरू आहे त्यामुळे बाहेर कामासाठी कुठे जाऊ शकत नाही. सर्वच बंद आहे, काय करायचं? तोंडाला कपडा बांधून तो तसाच बाहेर निघाला, बायकोला खोटेच सांगितले, जरा एकाला भेटायला जातोय बघतो सामानाची काही सोय होते का? बाहेर येऊन तो चालता चालता ढसाढसा रडला, त्याच अवस्थेत असताना एक हिरवी साडी नेसलेली बाई त्याच्या समोर आली आणि म्हणाली काय रे लेकरा, काय झालं रडायला, माधव ने सर्व परिस्थिती तिला सांगितली, त्यावर हसून ती त्याला म्हणाली अरे दादा त्या डाव्या गल्लीच्या उजव्या कोपऱ्यावर एक भला माणूस महिन्याभराचं सामान देतोय, जा तिकडे तुझी सोय होईल. उगाच इथे बसून रडू नको. ती लागलीच पुढे निघून गेली. तिच्या सांगण्यानुसार माधव त्या गल्लीत गेला आणि काय आश्चर्य खरंच एक मनुष्य तिथे शिधा वाटप करीत होता. त्याने माधवला स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला आणि काही लागलं तर कॉल करायला सांगितले. सामान मिळाल्याच्या आनंदात माधवने थेट घर गाठले, निदान पुढचे काही दिवस तरी त्यांना जेवणाची भ्रांत नव्हती. सोबतीला स्वामींचे नामस्मरण सतत त्याच्या मुखी होते.

पण प्रारब्ध कोणालाही चुकले नाही. एके रात्री त्याच्या वडिलांना हृदयविकाराच्या झटक्याने देवाज्ञा झाली.  एका दुसऱ्या घरी त्याचे आई-वडील स्वतंत्र रहात होते, म्हटलं तर दोघांच्या घरामध्ये अंतर खूपच होते. इतक्या रात्री बाहेर कसे जायचे? महाराज सांभाळा मला, योग्य ती तयारी करून तो घरातून निघाला. समोरून एक गाडी आली त्यातील ड्रायव्हर ने त्याला पत्ता विचारला, तो पत्ता नेमका माधवला जिथे जायचे होते तिथलाच होता, त्याने गाडीवाल्याला आहे ती परिस्थिती सांगितली, गाडीमध्ये बसायची सोय झाली आणि गाडी थेट त्याच्या आई वडिलांच्या घरापाशी आली. चेहऱ्यावर चादर झाकलेली, बाजूला आई रडत बसलेली पण महामारीमुळे तिथेही बंधन होते, तो आईला मिठी मारुन धड रडूही शकत नव्हता. एक डॉ काका होते त्याच्या परिचयाचे, त्या परिस्थितीत त्यांनी सर्वांना खबरदारीच्या सूचना केल्या. थोड्याच वेळात एम्ब्युलन्स आली. त्यातून काही माणसं PPE किट घालून खाली उतरली. त्याच्या बाबांना घेऊन गेले. तो मागून डॉ काकांसोबत त्यांच्या गाडीत होताच. गाडी म्युन्सीपालिटीच्या हॉस्पिटलमध्ये गेली तिथे डॉ काका सोबत होते. त्यांनी योग्य ती कागदपत्रे हाताळून, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, त्यांची NOC घेऊन पुन्हा हॉस्पिटलमध्ये येऊन, माधवच्या वडिलांचे पार्थिव ताब्यात घेतले. शेवटचे दर्शन तेव्हाच झाले त्याला.....त्यांचा निपचित पडलेला पंधरा फटफटीत चेहरा पाहिला आणि तो तिथेच कोसळला. डॉ काकांनी त्याला सावरलं आणि सगळी रीतसर कारवाई करून पुन्हा अंत्यसंस्कार करायला स्मशानाच्या दिशेने निघाले. पार्थिव एम्ब्युलन्स मध्ये होते, शेवटचे चार खांदे देखील नशीबामध्ये नव्हते, अशा परिस्थितीत दाह संस्कार झाले आणि तो घरी आला. त्यानंतर दशक्रिया विधीपासून ते अगदी तेराव्याचे विधी होई पर्यंत डॉ काकांनी त्याची पाठ सोडली नाही. लागणारा सर्व खर्च त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून केला होता, हिशोबाचे नंतर बघू असे म्हणत तेराव्या दिवसानंतर काका मोकळे झाले.

दिवसामागून दिवस जात होते, काकांचे पैसे दिले तर पाहिजे पण नोकरी अभावी काहीच नव्हते, अशामध्येच लॉक- डाऊन हळूहळू शिथिल होत होते. माधव ने काम नव्याने शोधायला सुरुवात केली. त्याच वेळेस एक व्यक्ती त्याला भेटली, त्याने माधवला ओळखत असल्याचे सांगितले. माधव ने त्याच्याकडे नोकरीचा विषय काढला, तर त्या व्यक्तीने त्याला एक चांगली संधी दिली.  त्यांचे घाऊक सामानाचे दुकान होते, माधवने त्यांच्याकडून सकाळी ठराविक सामान न्यायचे त्याची विक्री करायची आणि संध्याकाळी राहिलेलं सामान व जमलेले पैसे त्यांच्याकडे सोपवायचे. नवीन दिवस नवीन सामान असा त्यांचा नित्यक्रम सुरू होता. सामानाची विक्री होत होती माधवचा पैशांचा प्रश्न सुटला होता. आणि एक दिवस माधव सहज म्हणून जो बाहेर निघाला तोच ही स्वामींच्या सावलीची घटना घडली......

स्वामी म्हणाले, आठवलं का सारे? ती हिरवी साडी नेसलेली बाई अन्नपूर्णेच्या रुपात मीच होतो. तो जेवणासाठी सामान देणारा मनुष्य आठवतोय का? आता आठव तो गाडीवाला. इतकंच काय पण तुझे वडील गेले तेव्हा सर्व कार्य यथाशक्ती पार पाडणारे तुझे ते डॉ काका पण मीच होतो. त्यानंतर तुझी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी संधी देणारा तो व्यापारी हि मीच होतो. मी या सर्व कालावधीत तुला सोडून कुठेही गेलो नव्हतो, तू घेत असलेल्या नामाला अगदी सावलीसारखा धरून होतो. मग सांग बरं मी तुझ्या अंतःकरणात असताना तू बाह्य जगात मला का बरे शोधतोस????

 स्वामी हो चुकलो माफ करा, असे बोलून माधवने स्वामींचे पाय धरले. त्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा प्रेमळ हात ठेवून महाराज पुन्हा त्याच्यातच सामावले अगदी तसेच जसे आतापर्यंत सोबत होते.


घरी येऊन माधवने या जेवणाचे सामान देणाऱ्या व्यक्तीला कॉल केला, तर समोरून उत्तर आले "This number is does not exist." तो डॉ काकांच्या घरी गेला तिथे टाळे होते. शेजाऱ्यांकडून समजले, लॉकडाऊन पूर्वी काका लेकीकडे अमेरिकेत गेले ते परत आलेलेच नाहीत. त्या व्यापाऱ्याला भेटायला गेला तर ते दुकान तिथे नव्हतेच त्या जागेवर स्वामींचे छोटे मंदिर होते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार जेव्हापासून त्यांची दुकाने आहेत तेव्हापासून तिथे स्वामींचेच मंदिर आहे (अंदाजे 15 वर्षे). त्या जागेवर कोणतेही दुकान नव्हते.
आता मात्र माधवला खात्री झाली होती महाराज कायम आपल्या पाठीशी सावली बनून उभे आहेत. त्यांना आपण इतरत्र शोधायची गरज नाही. ते कायम आपल्या सोबत आहेत...
"मैं हूं ना इधर" म्हणत......

आपल्या प्रत्येकाला महाराजांचे काही ना काही अनुभव येतातच. या महामारीच्या काळात त्यांनीच आपली काळजी घेतली आहे, त्यांनीच आपला सांभाळ केला आहे. फक्त नामस्मरण करण्यामध्ये खंड पडू देऊ नये ही विनंती.

श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.......

आपला,
स्वामीभक्त(खुळा)
©श्री रितेश वेदपाठक.
7972033197
8421132224

Tuesday, March 24, 2020

मानसपूजा

श्री स्वामी समर्थ,
||जाते जाते बोले स्वामी,
हम गया नही जिंदा है.||

स्वामींनी जर स्वतःच सांगितले आहे की मी इथेच आहे मग आपण का  शोध घेत फिरतोय त्यांचा? ते आपल्यातच आहेत. "मुझे वही जानता है जो खुद को समझता है." शंकर बाबा नेहमी हेच म्हणतात ना? मग ओळखायला शिका स्वतःला. "मुझे तेरे हृदय में देखने की कोशीश कर मे सदा तेरे साथ हूं" हे वाक्य तर गिरनार वारी करून आल्यावर जो तिथून प्रसाद मिळतो त्या धुनीच्या फोटोवर लिहीलेलंच आहे. हे सर्व लिहिण्याचे प्रयोजन इतकेच की आपण सध्या कोरोनाच्या प्रभावामुळे स्वतःच्याच घरामध्ये बंदिस्त आहोत लोकांचा वेळ जात नाही आहे म्हणे. पण मग हा वेळ जातोय कुठे? काहीतरी करण्यात वेळ दवडण्यापेक्षा नामस्मरण करण्यात सत्कारणी लावा की ही वेळ, नाहीतरी अशी संधी पुन्हा मिळणे नाही. घराबाहेर येऊन संसर्ग लागण करून घेण्यापेक्षा नामामध्ये दंग होऊन नामाची लागण केव्हाही चांगलीच नाही का?

२६ मार्चला स्वामी समर्थांचा प्रकटदिन आहे, तेव्हा कोणत्याही मठामध्ये जाता येणार नाही ही खंत जर असेल तर साधी सरळ उपासना आहे ती करा , त्यात जो आनंद मिळेल, अनुभव मिळेल तो नंतर मला नक्की कळवा, मानसपूजा हा सर्वोत्तम उपाय आहे, मानसपूजेत सचेतन सद्गुरु मनःपटलावर आणून नित्यनियमाने त्यांची मानसपूजा(मानसिक पूजा) केल्याने सद्गुरु संवादही करु लागतील, व हळूहळू साधकाला अचूक मार्गदर्शनही होऊ लागेल.

"अहं ब्रम्हास्मि" असे अध्यात्मशास्त्र सांगते. याचा अर्थ, "मी" ब्रम्हस्वरुप आहे.

येथे “मी” याचा अर्थ मानवी शरीर असा नाही. 'मी' म्हणजे सचेतन शरीराचे नियंत्रण करणारा 'आत्मा' होय. आत्मा आणि परमात्मा ही भिन्न स्वरुपे नाहीत. आत्मा किंवा परमात्मा निर्गुण-निराकार असल्याने, भगवंताचे प्रातिनिधिक स्वरुप म्हणजेच आपले सद्गुरु. साधकाला सद्गुरुंचा अनुग्रह झाला म्हणजे सद्गुरु सूक्ष्मरुपाने साधकाजवळच असतात. साधकाच्या हृदयात त्यांची वस्ती असते. हे वायुसुत हनुमानाने आपली छाती फाडून हृदयातील प्रभु राम चंद्राची मूर्ति सीतामाईला दाखविली, या वरुन स्पष्ट होते. अशा प्रकारे साधकाच्या हृदय कमलावर सूक्ष्मरुपाने विराजमान असणाऱ्या सद्गुरुंना सचेतन देहस्वरुपात कल्पनेने निर्माण करुन मानसपूजेस प्रारंभ करावा.
 "साधक स्वामींचा" (रितेश वेदपाठक लिखीत)या पुस्तकामध्ये मानस पूजेमधून मिळालेली पोचपावती मी आधीच सर्वांना दिलेली आहे. साधक कोण? हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे, त्यापेक्षा आपण या पुस्तकामधून साधना कशी शिकूया याचा विचार करावा, मानसपूजेमध्ये  साधकाने कायकाय व कसे प्राप्त केले याचे वर्णन साधक स्वामींचा पुस्तकात आहेच. आपण देखील मानसपूजेद्वारे आपली साधना वाढवूया, प्रत्येकाचे नामस्मरण वाढावे व येणाऱ्या काळातील (घोरकलीयुगातील) संकटांना मात देण्यासाठी प्रत्येकाची मानसिकता वाढावी यासाठी मी नेहमीच प्रत्यनशील आहे. त्यामुळे आपण सर्वांनी स्वामींच्या प्रकटदिनी मानसपूजेद्वारे स्वामींना साकडे घालून आपल्या वरील आलेल्या विपत्तीतून लवकर बाहेर काढण्यासाठी महाराजांना प्रार्थना करूया.

सर्वांनी आपल्या घरातच राहून मानसपूजेद्वारे महाराजांचा प्रकटदिनाचा सोहळा साजरा करूया.

आपला,
स्वामीभक्त(खुळा)
श्री रितेश वेदपाठक.
७९७२०३३१९७
८४२११३२२२४

Wednesday, March 18, 2020

चला घोरकष्टोधरण स्तोत्र वाचन करूया

श्री स्वामी समर्थ
ज्याच्या झोळीमध्ये जितकी जागा असते तितकीच वस्तू त्याच्या झोळीत भरते, जर एखाद्याला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त मिळाले तर तो त्याचा दुरूपयोग करतो. चीन कडून सुरुवात झालेला आणि समस्त सृष्टीला भयंकर अशा संकटात त्रास भोगायला लावणारा करोना आजार त्यातीलच एक.

अशा या विपत्तीतून बाहेर येण्यासाठीच वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी यांनी "घोरकष्टोधरण
"  स्तोत्राची रचना केलेली आहे, कितीही मोठे संकट असो या स्तोत्राच्या पठणाने त्याचे निवारण नक्की होते. चला तर मग आपण देखील work from home करूया, संकल्प पूर्वक स्तोत्र पठण करूया:-
आपल्या गुरूंचे स्मरण करून (ज्यांचे सदेह गुरू नाहीत त्यांनी दत्त महाराजांचे स्मरण करावे) पुढील संकल्प करावा.
संकल्प:- हे भगवान हे भगवती समस्त सृष्टीचे रचयेता या करोना नावाच्या व्याधी पासून समस्त सृष्टीचे रक्षण करा, दया करा, धर्म आणि सत्याचा जो नाश होत आहे, त्यामुळे विविध व्याधी-त्रासाने समस्त सृष्टी त्रस्त आहे, त्या सर्व व्याधींपासून आमचे सर्वांचे रक्षण करा, रक्षण करा, रक्षण करा.

आम्ही "घोरकष्टोधरण" ह्या स्तोत्राचा पाठ वेळा करण्याचा संकल्प समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी, संपूर्ण मानव जातीच्या रक्षणाकरता करीत आहोत, या महाभयंकर विपदेपासून संपूर्ण भूलोकाचे निवारण करा, सर्वांचे रक्षण करा, सर्वांची रक्षा करा.

संकल्प करून झाल्यावर किमान  माळ (१०८ वेळा) तुमचा मंत्र (मंत्र माहीत नसल्यास श्री स्वामी समर्थ) जप करावा आणि नंतरच स्तोत्रास आरंभ करावा.

||घोरकष्टोधरणस्तोत्रम ||

श्रीपाद श्रीवल्लभ त्वम् सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। १।।

त्वम् नो माता त्वम् पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ।।
त्वम् सर्वस्वम् नोऽप्रभो विश्वमूर्ते ।घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। २।।

पापम् तापम् व्याधिमाधिम् च दैन्यम् । 
भीतिम् क्लेशम् त्वम् हराऽऽशु त्वदन्यम् ।।
त्रातारम् नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ३।।

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता ।
 त्वत्तो देव त्वम् शरण्योऽकहर्ता ।।
कुर्वात्रेयानुग्रहम् पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ४।।

धर्मे प्रीतिम् सन्मतिम् देवभक्तिम् । सत्संगाप्तिम् देहि भुक्तिम् च मुक्तिम् ।
भावासक्तिम् चाखिलानन्दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ५॥
श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् ।प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥ ६॥

इति परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामीमहाराज विरचितं घोरकष्टोधरणस्तोत्रम सम्पूर्णम् ।।

घोरकष्टोधरणस्तोत्रम अर्थ

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मां पाहि देवाधिदेव |
भावग्राह्यक्लेश हरिन्सुकीर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||१||

अर्थ:- हे देवाधिदेवा! श्रीपाद श्रीवल्लभा! तू नित्य निराकार निर्विकार आहेस. तूच स्वयं श्री दत्तात्रेयांचा स्वरूप आहेस. आमच्या प्रार्थनेला तू फलद्रूप करून आपल्या शरणात घे आणि आमचे रक्षण कर. आमचे सर्व प्रकारचे दुःख, क्लेश यांचा तू हरण कर आम्ही तुझी भक्ती करतो. तुझे सुंदर नामाचे गुणगान करतो, कीर्तन करतो. घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

त्वंनोमाता त्वंपिता आप्तोधिपस्त्वम् त्रातायोगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् |
त्वम् सर्वस्वम् नोप्रभो विश्वमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||२||

अर्थ:- तु माता, तूच पिता, आप्त बन्धु भ्राता आहेस. हे सद्गुरु, तूच त्राता आहेस, अर्थात आम्हाला या अघोर क्लेशतून काढणारा आहेस, तूच आमचे योगक्षेम चालवणारा आहेस.
तुझ्याविना कोणीच आमच नाही, तुच सर्वस्व आहेस. हे विश्व तुझ्याच रूपाने विनटले आहे. हे त्रिविक्रम भारती ला विश्वरूप दाखवणार्या श्रीदत्ता, घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

पापं तापं व्याधिमाधिंच दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यम् |
त्रातारंनो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||३||

अर्थ:- हे ईश्वरा, तूच आमचे पाप, ताप हरण करणारा आहेस. तूच सर्व व्याधी, दैन्य, दुःख, दारिद्र्य निवारण करणारा आहेस. या जन्म मरणाच्या च्या भीती आणि क्लेशातून मुक्त करणारा तूच आहेस तुझ्या शिवाय दुसरा कोणीच हे करू शकत नाही तूच सद्गुरू आहेस. घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

नान्यस्त्राता नापिदातानभर्ता त्वत्तोदेवत्वं शरण्योकहर्ता |
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||४||

अर्थ:- हे सद्गुरो ! तुझ्या शिवाय आम्हाला तारणारा कोणी नाही. आम्हाला देणारा आणि आमच भरण पोषण करणारा पण तुझ्या शिवाय कोणी नाही. तेव्हां, हे सद्गुरू, आम्ही तुला अनन्य शरण आलो आहे कारण तूच आमचा देव आहेस. हे आत्रेया (अत्रिपुत्रा) आमच्या वर अनुग्रह कर, घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं |
भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||५||

अर्थ:-  हे अखिलान्दमूर्ते! तुच जगातल्या सगळ्या आनंदाची साक्षात मूर्ती आहेस. आम्हाला धर्मावर प्रीती दे, सन्मती आणि तुझी अर्थातच देवाची भक्ती दे. हे देवा, आम्हाला सत्संग अर्थातच चांगल्या लोकांचा साथ दे, जगातले भोग भोगून आम्हाला मुक्ती दे. तुझ्या चरणी आमचा सतत भाव असो हीच आसक्ती दे. घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमंगलवर्धनं | प्रपठेन्नियतोभक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत् ||

अर्थ:- वरील पाच श्लोक लोकांच्या मांगल्याची वृद्धी करणारे आहेत. तसेच, जो कोणी या स्तोत्राचे नित्य भक्ती ने पठाण करेल, तो श्रीदत्ता ला प्रिय होईल.

चला तर मग एक छोटासा प्रयत्न तर करू, बाकी कार्य सिद्धीस नेण्यास स्वामी समर्थ आहेतच.

नाम घे तू मुखी नाम घे रे,
स्वामी तुमच्या सदैव पाठीशी रे.
भय नको बाळगू तू नाम बाळग,
आळव स्वामींना भक्ता आर्त आळव.

स्वामीभक्त(खुळा)
श्री रितेश वेदपाठक.

Saturday, February 1, 2020

गजर तुझ्या नामाचा सदा मुखी माझ्या.

नमीतो तव चरणी नामाचा खुळा,
घे रे ध्यास या खुळ्याचा देवा.
भजतो नाम तुझे देहबुद्धी हरपून,
होऊ दे रे मला प्रपंचाचे वीस्मरण.
नामाचा प्रपंच आणि प्रपंचाचे नाम,
खुळ्याचा भोळा भाव देवा तुलाच ठाव.
तव चरणी ठेवी माथा हा खुळा स्वामीभक्त,
नामाच्याच पाठीमागे धावतो माझा भगवंत.
चुकांची क्षमा असावी स्वामीराया,
चरणी वाहतो आमुची दिन काया.
द्यावे अभय तुमच्या चरणांपाशी,
दिनदैना झाली माझी आस तुझ्या भेटीची.
भेट घेतो गिरीनारी देवा तुझ्या पर्वती,
घे मला मिठीत गर्जूदे तुझ्याच नामाचा गजर.

स्वामी हो,
तुमच्याच नामी रंगलेला
तुमचा खुळा.
(रथसप्तमी ०१/०२/२०२०)

Wednesday, January 8, 2020

स्वामींचे खुळे लाड

             आजचे ९जानेवारी २०२०
                स्वामींचे खुळे लाड